"विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविणे हि आपली जबाबदारी....!"
--वढोदा येथे श्री जयपालसिंह गिरासे यांचे प्रतिपादन !
प्रतिनिधी (चोपडा) दि.३ "भारत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असून आगामी काळात भारतीय तरुण आपल्या कार्यशैलीने जगावर आपला प्रभाव टाकतील. भारतमाता जगदगुरूच्या रूपाने अखिल जगतास मार्गदर्शन करेल. हा आशावाद स्वामी विवेकानंदानी जोपासलेला होता व तो खरा ठरविण्यासाठी आम्हा सगळ्यांना अथक प्रयत्न करावे लागतील .. प्रत्येक तरुणाने विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविणे हि आपली जबाबदारी मानून या राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात स्वतःस झोकून देऊ असा संकल्प सार्ध शती समारोहाच्या निमित्ताने करावा" असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते श्री जयपालसिंह गिरासे यांनी वढोदा(ता.चोपडा) येथे आयोजित समारोहात केले. येथील विवेकानंद सार्ध शती समारोह समितीच्या वतीने श्री जयपालसिंह गिरासे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते. सुमारे तासभर चाललेल्या आपल्या व्याख्यानात विविध उदाहरणे व प्रेरक विचार सांगून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र मनुदेवी येथील आश्रमाचे महंत तसेच सातपुडा बचाव आंदोलनाचे प्रणेते श्री स्वामी माहंस जी महाराज होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्री अरुण पाटील; पोलिस पाटील श्री संदीप पाटील ,श्री राधेशाम पाटील आदी उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री स्वामी माहंस जी महाराज यांनी वढोदा येथील युवकांना धर्म जागरण व राष्ट्र जागरणाच्या महान कार्यास वाहून घेण्याची साद घातली. युवकांनी विवेकानंदांच्या कार्याचा व चरित्राचा अभ्यास
करून सेवा धर्म जोपासावा. संघटीत होऊन राष्ट्रविघातक बाबींना अटकाव करावा असे सांगितले. श्री स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने वढोदा येथील युवकांनी समारोह समितीचे गठन केलेले असून त्या माध्यमाने वर्षभर विविध जनजागृतीचे कार्यक्रम केले जाणार आहेत. समितीच्या वतीने निमंत्रित अतिथींचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment