Sunday 6 March 2011

कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही......!

जेव्हा जेव्हा समस्त  पृथ्वी  वर  काही  महापुरुष  जन्माला  आले ....त्यांनी  आपल्या  तेजस्वी  कटाक्षाने  या  मानव  समाजातले  दोष / उणीवा  पहिल्या  अन  या  वाट  चुकणाऱ्या  समाजाला , डोळे  असून  अंधत्व  आलेल्या  या  मानव  समूहाला  वेळोवेळी  उपदेश  करण्याचा  प्रयत्न  केला  तेव्हा  त्या -त्या  मानव  समूहाने  किंवा  समाजाने  त्या  महापुरुषांच्या  विचारांचा  स्वीकार  न  करता  चक्क  तिरस्कार  केला आहे.
काही वेळा या समूहाने क्रौर्याची सीमा ओलांडून उपदेश करणाऱ्या महापुरुष व्यक्तींना यमसदनी हि रवाना केलेले आहे.
जिवंत असे पर्यंत त्यांचे कोणी ऐकायला तयार होत नाही ....हा इहलोक सोडून गेल्यावर मात्र समाजाला जाग येते...इतिहास आणि समाज शास्र चे संशोधक त्या महापुरुषांच्या जीवनावर संशोधन करतात.....चरित्रे लिहितात....काही दानशूर मंडळी पुतळे उभारतात....स्मारके बांधतात.....आणि या धावपळीत त्यांचे मूळ विचार हि विसरतात..!
म्हणजे या मानव समाजाची अशी धारणा आहे कि, " कोणीही असामान्य व्यक्ती....जो त्यांच्यापेक्षा वेगळा आहे....वेगळा विचार करतो व मांडतो ...वेगळा आचार पाळतो....." अशा व्यक्तीला पाण्यात पाहणे". 
येशू, गांधी,फुले,आगरकर या सारख्या महामानवांना  देखील या समूहाने छळले आहे.ज्यांचा जिवंतपणी तिरस्कार केला गेला आज कर्णोपकर्णी त्यांच्याच नामाचा जप सुरु आहे. ज्या आगरकरांची पुण्यातील सनातनी लोकांनी जिवंतपणी अंत्ययात्रा काढली होती आज तीच मंडळी आगरकरांच्या कार्यावर संशोधन करण्यात मग्न आहे.एकंदरीत परिस्थिती हि विसंगत आहे. जेव्हा ती मंडळी जिवंत होती तेव्हा त्यांना त्रास  दिला गेला यावर म्हणावेसे वाटते, " मेल्यावर हार टाकायचे होते  ....; .तर   जिवंतपणी काटे  दिले  कशाला ?"
उपरोक्त मंडळी हि आपल्या पेक्षा वेगळी आहे.....वेगळा दृष्टीकोन जोपासणारी आहे...आपला 'श्रुतीमृतीपुरानोक्त' अशा आचार-विचारांवर घणाघाती हल्ला चढविणारी  बंडखोर अशी आहे.म्हणून असूये ने ह्या सामाजिक विकृती ने असा छळवाद जोपासला.नंतर या समाजाला पच्छाताप झाला पण त्यावेळी खूपच उशीर झालेला होता.शेवटी आज जी नाटके दिसतात ती केवळ प्रायश्चित्त म्हणून अस्तित्वात आलेली दिसतात.अलीकडे हि समाजात-व्यवस्थेत  सुधारणा घडवून आणण्यासाठी...जी-जी मंडळी जीव ओतून काम करते आहे .....प्रशासनातील  भ्रष्ट -नतद्रष्ट  प्रवृत्तीन विरुद्ध धाय मोकलून ओरडत आहे तरी त्यांच्या हाकेला 'ओ' देण्याची कुवत आपल्या समाजात उरलेली नसून.....'षंढ'  झाल्यागत....कर्णबधीर झाल्यागत तो निपचित पडलेला आहे.....कदाचित ते गेल्यावर त्यांचे हि पुतळे उभारले जातील....इतिहासात त्यांचा उल्लेख हि केला जाईल.....पण सध्या फक्त वनवास.......छळवाद आणि व्यर्थ  बकवास.....!
जिवंतपणी एखादी व्यक्ती पुढे जात असेल त्याच्या तंगड्या खेचणे हा जणू मानव समूहाचा स्वभाव धर्म बनू पाहत आहे. बादलीतील खेखड्यांच्या धर्मानुसार आम्हीही पाय खेचण्यात तसूभर हि कमी नाहीत हे क्षणो-क्षणी मानव समूह दाखवून देत असतो.या गुणांच्या बाबतीत....भाषा,प्रांत,वर्ण,धर्म इ. पलीकडे जाऊन पहिले तर खर्या अर्थाने एकवाक्यता दिसून येईल.....म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेचे हे महान उदाहरण देखील ठरू शकेल...यात शंका नाही.पाय ओढून आम्ही कोणाला 'वर' जाऊ देत नाही........आम्ही हि जात नाही.शेवटी एखादा कायमचा 'वर' गेला तरी चालेल, परंतु एखादा वर गेलेला, पदोन्नती झालेला, प्रगती-पथावर गेलेला आम्हाला मुळीच सहन होणार नाही. तो 'वर' गेला तर आम्ही त्याच्या वहाणांची 'पादुका' म्हणून जरूर पूजा करू....! शाळेत मुलीना शिकविण्यासाठी जाणार्या सावित्री बाई फुलेंवर चिखल फेक करणाऱ्या पुण्यातील मंडळी आज शिक्षण क्षेत्रात अग्रभागी आहे.
एकंदरीतच "कुत्र्याला गती....व मानवाला प्रगती " सहन होत नाही असे उपरोधाने म्हणावेसे वाटते. एखादी वेगाने जाणारी वस्तू.....वाहन...किंवा व्यक्ती पाहिली कि श्वान महाशयांच्या अंगात सारी ताकद एकवटली जाते त्या वेगोपासक घटकाच्या मागे ती भुंकत-भुंकत धाऊ लागते.सदरहू वेगवान घटक थांबला तर हि पाठलाग करणारी श्वान जमत हि शांत होते. आपला धावपट पुन्हा सुरु झाला कि ,पुन्हा श्वान राजाचा 'भूकपट  ' सुरु होतो. म्हणजे श्वान  मंडळीस गती ह्या शब्दाची  ऍलर्जी  आहे. आज सारे जग 'गती' साठी झटत आहे....प्रत्येकाला कोठे-न-कोठे गती हवी आहे....गतीविना मती व नीती चालत नाही....गतीविना राष्ट्र जगू शकत नाही..... त्याच गती बद्दल या श्वान महोदयांना का बरे एवढे वावडे असेल?
कोणत्याही गतीचा वेग सहन न होणे हा श्वान धर्म आहे तसाच एखाद्याची 'प्रगती' सहन न होणे हा मनुष्य धर्म मानावाच लागेल. मग ती प्रगती आर्थिक -राजकीय -वैचारिक असो कि, सामाजिक असो....माणूस नावाचा प्राणी ती डोळ्यात खुपवून घेईलच.
इतिहासात हि तसे दाखले आहेतच......पृथ्वीराजाचा काटा काढण्या साठी जयचंद परक्या "घोरी" ला निमंत्रण देतोच......पौरसा चा पराक्रम पाहवत नाही म्हणून एखादा अंभी सिकंदराला सहाय्य करतोच .......राणाप्रताप एकटा स्वतंत्र आहे म्हणून मानसिंग अकबराच्या छत्रछायेखाली आक्रमण करतोच.छ.शिवाजी राजे हि आधी स्वकियांशीच लढलेत. आज हि आम्हाला परकीय शत्रू ऐवजी स्वकीय शत्रूंचे जास्त भय आहे.
तात्पर्य: एखादी व्यक्ती अथवा संस्था किती हि चांगले ध्येय घेऊन वाटचाल करीत असेल तरी हि त्यांच्या मागे शान प्रवृत्ती चे शुक्लकाष्ठ लागेल च यात शंका नाही....!
(c) -----जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे
९४२२७८८७४० ,शिरपूर ,जि-धुळे [महाराष्ट्र]

1 comment:

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...